राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

गणेश कवाडे | Updated: Oct 9, 2023, 02:25 PM IST
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं title=

Mumbai Toll Plaza : छोट्या गाड्यांकडून टोल घेतल्यास टोलनाका (Toll Plaza) जाळून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी (Raj Tackeray) दिला.. आणि त्यानंतर आता मनसैनिक (MNS) आक्रमक झालेत.. टोलनाक्यावर मनसैनिक टोल न देताच गाड्या सोडून देत आहेत... हलक्या चारचाकी वाहनांकडून कोणताही टोल घेतला जात नाहीए.. पनवेलच्या शेडुंग आणि मुलुंड टोलनाक्यावर आक्रमक मनसैनिकांनी गाड्या फुकट सोडल्यायत.. टोलसाठी उपोषण करणारे मनसे नेते अविनाश जाधव मुलुंड टोलनाक्यावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत.. तर पनवेल टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झालेत..

मनसे नेते अविनाश जाधव हे मुलुंड आनंदनगर टोलनाका येथे पोहोचले आहेत आणि मुलुंड टोलनाका परिसरामध्ये चार चाकी वाहनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत दाखवून तो न भरण्याचं आवाहन वाहन चालकांना केलं जात आहे. 

फडणवीसांचं ती मुलाखत
फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राज्यात फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नसेल तरीही वसुली झाल्यास टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. टोल हा राज्यातला सर्वात मोठा स्कॅम आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. राज्यात केवळ व्यावसायिक वाहनांना टोल असल्याची माहिती काल फडणवीस यांनी दिली होती. हे जर खरं असेल तर कारकडून टोल वसुली करू देणार नाही, नाहीतर टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरे म्हणाले. 

टोलवरुन सत्ताधारी-विरोधक आमने सामने
राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी टोलबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. राज्य सरकारनं त्यांच्या अखत्यारितील टोल बंद केले असल्याचं सांगत छगन भुजबळांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारच्या रस्त्यांवरचा टोल बंद झालाय. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केलीय असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.  तर टोल म्हणजे भाजपकडून सुरू असलेली मोठी लूट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. 

फडणवीसांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिलाय. आता फडणवीसांच्या कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण जारी केलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांनी 31 मे 2015 ला काही टोलनाक्यांवर वसुली बंद केली, तर काही टोलनाक्यांवर सूट दिल्याचं म्हटलंय. PWDचे 11 आणि MSRDCच्या 12 टोलनाक्यांवर वसुली बंद झाली, तर PWDच्या उर्वरित 27 आणि नाक्यांवर MSRDCच्या उर्वरित 26 टोलनाक्यांवर कार, जीप, एसटीला सूट देण्यात आली असं यात म्हटलंय.