गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा

कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत.

Updated: Mar 5, 2018, 06:26 PM IST
गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा title=

दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई : कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत, तर मुंबईतून तब्बल १८४ भामटे अशा पद्धतीने लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवून पसार झाले आहेत. या भामट्यांनी मागील तीन वर्षात मुंबईतील गुंतवणुकदारांचे तब्बल १९ हजार ६७१ कोटी रुपये बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पंजाब नॅशनल बँकेची ११ हजार कोटींची फसवणूक करून नीरव मोदी परदेशात फरार...विजय मल्ल्या बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरार....
असेच मोदी मल्ल्यासाराखे 184 भामटे 19 हजार कोटी रुपये बडवून पसार झाले आहेत.

देशातील कोट्यवधी रुपये बुडवून पलायन केलेल्या या दोघांचा सीबीआय शोध घेत आहे. मात्र एकट्या मुंबईत असे तब्बल १८४ मोदी आणि मल्ल्या मागील तीन वर्षात फरार झाले आहेत. या १८४ भामट्यांनी २०१५ ते २०१७ या तीन वर्षात गुंतवणुकदारांचे तब्बल १९ हजार ६७१ कोटी रुयये बुडवले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार आकडेवारी

2015 साली - 73 प्रकरणात - 5560 कोटी तर 
2016 साली - 103 प्रकरणात - 4273 कोटी  
आणि 
2017 साली - 107 प्रकरणात - 9838 कोटी असे 
एकूण 19 हजार 671 कोटी रुपये भामट्यांनी बुडवले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकदारांची फसवणूक होऊनही आर्थिक गुन्हे शाखेने मागील तीन वर्षात केवळ ७४ गुंतवणुकदारांचे अडीच कोटी रुपयेच परत मिळवून देण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय. तर न्यायालयात दाखल झालेल्या ८० प्रकरणांपैकी केवळ २० प्रकरणांमध्येच शिक्षा होऊ शकलेली आहे.