संघर्ष कठीण आहे, खचून जावू नका- राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

नांदेडचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Updated: Aug 17, 2020, 09:16 PM IST
संघर्ष कठीण आहे, खचून जावू नका- राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी हे पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं की, संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.'

'अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.'

'मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.' असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी सुनील ईरावर यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यकर्त्यांना विनंती केली की, 'माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.'

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या. असं आवाहन देखील त्यांनी केली आहे.