'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 9, 2023, 05:25 PM IST
'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप title=

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या (Murder), बलात्कार (Rape), दंगली (Riots), विरोधकांना धमक्या (Thret), विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणाऱ्या मुंबई (Mumbai) आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून शिंदे फडणवीसांचे जंगलराज सुरु आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी केला आहे.

राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था राज्यात सुरु असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना जीवे मारण्याच्या धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या शहरांमधून तणावाच्या घटना घडत आहेत. सरकारच्या आशिर्वादाने सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असून जाणिवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मुकदर्शक होऊन पहात बसले आहेत तर गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत.

आता विरोधी पक्षांच्या नेत्यांना गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारविरोधात बोलणे बंद करा अन्यथा तुमचा दाभोळकर करू असे म्हटले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे असे कधी घडले नव्हते. पण ज्या विचारांनी नरेंद्र दाभोलकर आणि क्रॉमेड पानसरेंना संपवले त्या विचारांचे लोक आता लोकशाही मानणाऱ्या पुरोगामी विचारांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले आहे. या सरकारच्या अकार्यक्षमतेने सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. या सरकारला कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. आम्ही सत्तेत आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांवर 24 तासांत कठोर कारवाई करून त्यांना सुतासारखे सरळ करू असंही नान पटोले यांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत येऊन एक वर्ष झाले तरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अजून झालेला नाही. राहुल नार्वेकर हे कायद्याचे विद्यार्थी आहेत, राज्यघटना, पक्षांतरबंदी कायदा आणि नियमावलीतील तरतुदींनुसारच ते निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, या प्रकरणी जास्त वेळ न घेता लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.