शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द?

आम्ही शिवसेनेच्या विरोधाची फारशी पर्वा करत नसल्याचा संदेशही भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला आहे का, याविषयीही चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Nov 1, 2019, 11:54 AM IST
शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द? title=

मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपवारून सुरु असलेली धुसफुस संपुष्टात आणण्याचा अखेरचा पर्यायही आता धुसर झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेनेशी सत्तावाटपाची बोलणी करायला मुंबईत येणार होते. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यातील धुसफुस खूपच वाढल्यामुळे अमित शहा यांनीही मुंबई दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. राज्य नेतृत्वाच्या स्तरावर सेनेशी चर्चा करून वाद संपवावा, असे आदेश शहा यांनी भाजप नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीच चर्चा करावी लागणार आहे. तसेच तोडगा न  निघाल्यास अमित शहा मुंबईत येणारच नाहीत, असे सांगितले जात आहे.

यापूर्वी हरियाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अमित शहा यांनी जननायक जनता पार्टीशी (जेजेपी) बोलणी सुरु केली होती. अमित शहा यांनी चंदीगढमध्ये ठाण मांडून ही बोलणी यशस्वीही केली होती. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जुन्या मित्रपक्षाशी साधा संवाद साधण्याचे कष्टही अमित शहा यांच्याकडून घेतले जात नाहीत. एकूणच या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या विरोधाची फारशी पर्वा करत नसल्याचा संदेशही भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला आहे का, याविषयीही चर्चा सुरु झाली आहे. 

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; 'या' सहा कॉम्बिनेशन्सची चर्चा

मात्र, शिवसेना सध्या खूपच आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद मिळावे आणि सत्तेतही शिवसेनेला समान वाटा मिळावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही शिवसेनेला असे कोणतेही वचनच दिले नव्हते, असे सांगत ही मागणी धुडकावून लावली होती. 

यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेळ पडल्यास शिवसेना बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी भाजपला एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल, असा इशाराही दिला. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली चर्चा संपूर्ण देशाने पाहिली होती. विधानसभा निवडणुकीत जनतेनेही शिवसेना आणि भाजप यांना एकत्रितपणे कौल दिला आहे. जनतेचा हा कौल मानण्यास भाजप नकार देत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले होते.