'तर मी राजकारण सोडेन...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खुलं आव्हान

माझ्या राजकीय कारकिर्दीची मला भीती नाही, कारण... वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

Updated: Jul 15, 2022, 08:05 PM IST
'तर मी राजकारण सोडेन...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खुलं आव्हान title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. माझ्याबरोबर आलेल्या 50 मधला एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एखाद दुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही असं म्हटलं होतं. सत्तापरिवर्तन झालं ते लोकांना आवडेलेलं नाही, शिवसैनिक नाराज आहेत, त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. 

यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. या अगोदरचं बंड वेगळे होतं, त्यावेळची परिस्थितीही वेगळी होती. पण आताचं बंड नसून उठाव होता. विरोधक एकमुखाने सांगतायत की 50 मधला एकही आमदार निवडणू येणार नाही, पण 50 मधला एकही आमदार पडला तर मी सोडेन असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

एक-दोन आमदार आमच्याबरोबर आले असते तर ठीक पण पन्नास आमदार काही मागणी नसताना येतात, माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मी नेमकं काय करतोय, याची मला पूर्ण जाणीव होती, बंडावेळी मी 3 दिवस 3 रात्र झोपलो नव्हतो, माझ्या राजकीय कारकिर्दीची मला भीती नव्हती, कारण मी 50 आमदारांच्या भवितव्याची चिंता केली होती असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

कुटुंबाला वेळ न देता मी माझा प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी खर्च केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं, मी तुमचं 1 तास 15 मिनिटांचं भाषण ऐकलं, तुम्ही मनापासून  बोललात, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेयली सांगितलं. मी जिथे जातो तेच माझं मंत्रालय आहे, प्रत्येक ठिकाणी माझं काम सुरु असतं असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.