'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप

Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 30, 2024, 03:57 PM IST
'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप title=
Aaditya Thackeray On Electoral Bond

Aaditya Thackeray on Electoral Bonds: मुंबईतल्या झोपडपट्ट्या काढायच्या हे स्वप्न पियूष गोयल यांनी बोलून दाखवलं. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरु आहे. अशावेळी भीतीदायक योजना मुंबईत आणली जात आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे रोजगार तिथेच असतात. पण यांना तिथून काढायचं आणि मिठागरात सोडायचं असा प्लान असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. 

जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी ट्रेन सुरु केल्या नव्हत्या, याची आठवण ठाकरेंनी करुन दिली. 2022 पर्यंत सर्वांना घरे देऊ असे वचन भाजपने दिले होते. अनेकांकडून फॉर्म भरुन घेतले होते पण तेही पूर्ण केले नसल्याचे ते म्हणाले. 

तिथल्या तिथे घरे देऊ असे जुहू येथील नागरिकांनाही सांगितले होते. पण केंद्र सरकारने पुढे काय केलं नाही. आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईचा अपमान वेळोवेळी केला जातोय, असे ते म्हणाले. 

मिठागरे भाजपच्या मित्रांच्या घशात टाकणे सुरु आहे. गरीब जनता इलेक्ट्रोरोल बॉण्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून त्यांना बेघर करायचे सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. गरीबी हटाव नही तर गरीब हटाव अशी भाजपची नीती असल्याचे ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई उत्तर चे लोकसभा उमेदवार, भाजपचे श्री पीयूष गोयल जी ह्यांनी एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, झोपडपट्ट्या शहरातून काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात.गोयल जी, गेली 10 वर्षं केंद्रात भाजपचं संपूर्ण बहुमत असलेलं (हुकूमशाही) सरकार आहे आणि 8.5 वर्षं (2.5 घटनाबाह्य सरकार धरुन) तुमच्या पक्षाने राज्यावर राज्य केलं आहे. काल तुम्ही मुलाखतीत नमूद केलेल्या गोष्टींचा विकास करण्याच्या भरपूर संधी तुमच्या पक्षाला मिळाल्या होत्या... परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांना काय मिळालं? मुंबईकरांची फसवणूक, आर्थिक लूट आणि अभिमानाला ठेच! ,असे ठाकरे म्हणाले.

आज तुम्ही अचानक मुंबई उत्तर ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल. त्यांनाही शाश्वत विकास हवा आहे, ज्याला आम्हा सर्व मुंबईकरांचा पाठिंबा आहे!  भारताच्या विकासात त्यांचाही मोठा हात आहे!  2022 पर्यंत प्रत्येक नागरीकाला स्वतःचे घर असण्याचे तुमच्या पक्षाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नसल्याचे त्यांनी सांगितले. 

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांना बळजबरीने खारफुटी जमिनीवर हलवण्यास आमचा विरोध आहे! कदाचित तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लिहिलेली घटना ह्याचसाठी बदलायची आहे - 'मित्रांचा विकास आणि गरीब हटाओ!'शाश्वत विकासासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत! बिल्डर्सना फायदा व्हावा ह्यासाठी भाजपचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा आहे. शिवाय, असं होतं तर, मेट्रो कार डेपो 3,4,6 आणि 14 च्या कांजूरमार्ग जमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारने सॉल्टपॅन असल्याचा खोटा दावा करून का रोखला होता? फक्त मुंबईकरांना फायदा होईल म्हणून? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचं बिल्डर लॉबीपासून संरक्षण करू! आम्ही शहराचा सर्वांगिण विकास साधत झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पक्की घरं देऊ आणि मुंबईतून लढूनही महाराष्ट्रविरोधी हितसंबंध जपू पाहणाऱ्यांपासून आमच्या महाराष्ट्राचं रक्षण करू! स्पष्टं दिसतंय, सध्याच्या राजवटीचा हेतू 'गरीबी हटाओ' नसून 'गरीब को हटाओ' असा आहे, असे ते म्हणाले.