काजोल-अजय देवगणकडून प्लास्टिक बंदी निर्णयाचं स्वागत

प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं प्रदर्शन उद्घाटन सोहळा

Updated: Jun 22, 2018, 06:16 PM IST

मुंबई : उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याची घोषणा केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्यापासून प्लास्टिकचा वापर केला तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं जागणार आहे. तसंच 'दंडात्मक कारवाईत कुठेही शिथिलता येणार नाही असंही यावेळी पर्यावरण मंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं प्रदर्शन उद्घाटन सोहळा मुंबईतल्या वरळीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, महापौर, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण हे देखील उपस्थित होते. प्लास्टिकला बंदी आणल्यामुळे आता पर्यायी वस्तूचा विचार होतोय. याच विचारातून हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यावेळी अजय-काजोलने प्लास्टिक बंदीची गरज व्यक्त करत या निर्णयाचं स्वागत केलं. तर आपलं यश हे कायदा आणण्यात नाही तर त्याची अंमलबजावणी करण्यात असल्याचं मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

प्लास्टिक बंदीबाबत उत्पादक, वितरकांना हायकोर्टातून कोणताही दिलासा मिळालला नाही. म्हणजे उद्यापासून प्लास्टिक बंदीचा कायदा लागू होणार आहे. प्लास्टिक उत्पादक, वितरकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी ३ आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. २० जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.