फुले, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांबद्दल भाजपला असूया - जयंत पाटील

'भाजपला राग का यावा?'

Updated: Nov 30, 2019, 03:53 PM IST
फुले, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांबद्दल भाजपला असूया - जयंत पाटील title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला. सरकारकडून घेतलेली शपथ योग्य नाही, असे सांगत टीका केली. यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथविधीसोहळ्यात जर उल्लेख झाला तर भाजपला राग का यावा?, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपला असूया आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षाने त्यांचा मान राखणे आवश्यक होते, ते त्यांनी केलेले नाही, असे मंत्री जयंत पाटील म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, कामकाजाच्यावेळी भाजप आमदारांनी सभात्याग केला. 

तसेच शपथविधीचा विषय हा राज्यपालांच्या अखत्यारितील विषय आहे. तसेच शपथविधी हा सभागृहात झालेला नाही. त्यावर भाष्य करणार नसल्याचे स्पष्टीकरण विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजार वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसेच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.