महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 23, 2024, 11:24 AM IST
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास title=

Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले गेलं होतं. हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

कोण होते मनोहर जोशी?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. त M.A. L.L.B झाले होते. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. पण, नोकरीपेक्षा त्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त होता. त्यांनी कोहीनूर इंस्टीट्यूटही सुरू केली. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवयायिक प्रशिक्षण देणे सोपे होईल. 

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत.  तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती. या काळात  भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांची नाराजी यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता. पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव चर्चेत होतं.