सोनू सरकारवर भरवसा नाय!

सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Updated: Jul 23, 2017, 05:44 PM IST
सोनू सरकारवर भरवसा नाय! title=

मुंबई : सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं.

सरकारचं रामराज्य फक्त कागदावरच असल्याचं सांगत शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मुद्यांवर सरकारवर घेणार असल्याचे मुंडेंनी म्हटलंय. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी मुंडेंनी केलीय.

तसंच दुबार पेरणीसाठी सरकारने अधिवेशनात अनुदान जाहीर करावे असं मुंडे म्हणालेत. गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचार, एसआरएमधील भ्रष्टाचार, अधिकाराच्या नियुक्त्या यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलीय.

अधिवेशनाआधी विरोधकांमध्ये फूट

विविध मुद्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं अपेक्षित असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांमध्ये फूट पडलीय. काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते विखे-पाटलांनी सांगितलं.

सरकार गोंधळलेले असून शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ऐतिहासिक कशी असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य करा असंही विखे-पाटलांनी म्हटलंय.

यावेळी विखे-पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी वेगळी पत्रकार परिषद घेत असल्याकडे लक्ष वेधलं असता राष्ट्रवादीचा आमच्यावर भरवसा नाय का? असं विधान केलं. राष्ट्रवादी आणि आपल्यात काहीही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी शिवसेनेवरही विखे-पाटलांनी टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.