कोरोनाच्या संकटात राज्यपालांचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Updated: May 28, 2020, 03:55 PM IST
कोरोनाच्या संकटात राज्यपालांचा महत्त्वाचा निर्णय title=

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी राजभवनाला खर्चकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.  

काय आहेत राज्यपालांच्या सूचना?

- राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. फक्त प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.  

- पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तु वा स्मृतीचिन्ह देऊ नये. 

- पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करु नये. 

- स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.

- राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा.

- अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.

- कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी. 

वरील उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये १० ते १५ टक्के बचत होईल असा अंदाज आहे.

आपले एक महिन्याचे वेतन तसंच आगामी एक वर्षभर आपले ३० टक्के वेतन करोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आज जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपुर्ण ठरेल असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.