मुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे काँग्रेस नेते असे तोंडघशी पडले

दोनच दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या नवी मुंबई कोयना प्रकल्पग्रस्त जमीन घोटाळ्याला आत्ता वेगळेच वळण लागले आहे. 

Updated: Jul 5, 2018, 01:11 AM IST
मुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे काँग्रेस नेते असे तोंडघशी पडले title=

अमोल पाटील, झी मीडिया, रायगड : दोनच दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या नवी मुंबई कोयना प्रकल्पग्रस्त जमीन घोटाळ्याला आत्ता वेगळेच वळण लागले आहे. बंदुकीच्या धाकाने कवडीमोल भावात प्रकल्पग्रस्तांकडून कोट्यवधी किमतीचा भूखंड बिल्डरने घेतला, असा आरोप होता. मात्र शेतकऱ्यांनी हे आरोप फेटाळलेत. यामुळे आरोप करणारे काँग्रेसचे नेते तोंडघशी पडलेत. 

नवी मुंबई सिडकोच्या २४ एकर जमिनीची विक्री व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचं गंभीर आरोप करून काँग्रेसने खळबळ उडवून दिली होती .सिडकोच्या जमिनीची किंमत १७६७ कोटी रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भटिजा आणि संजय भालेराव यांना विकली, असं थेट दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

या प्रकरणात कोयना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचं काँग्रेसने म्हंटल होते. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरनेने विकत घेतल्या त्या शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. बिल्डरांनी बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी फेटाळलाय. 

तर हे प्रकरण उघडकीस आणणारे कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी सुनील मुसळे यांनी काँग्रेसने आपला वापर केल्याचं म्हटलंय. आपली सरकार, मुख्यमंत्री यांच्या विरोधात कसलीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.

सुरुवातीपासून या घोटाळ्यात राजकीय दबाव होता. अचानक शेतकऱ्यांनी आपली भूमिकेवरून यु टर्न घेतल्याने काँग्रेसचे नेते सपशेल उघडे पडलेत. मात्र तरीही अधिवेशन काळात हा मुद्दा विरोधक उपस्थित करणार अशी चिन्ह दिसतायेत.