शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस म्हणजे... काँग्रेसची बोचरी टीका

'ईडी सरकारच्या काळात गुजरात हिताची जपणूक आणि महाराष्ट्राला वाटण्याच्या अक्षता'

Updated: Oct 7, 2022, 06:11 PM IST
शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस म्हणजे... काँग्रेसची बोचरी टीका title=

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) येऊन 100 दिवस झाले. या 100 दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे आणि सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने 100 दिवसात केल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

ईडी सरकारचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं पण अद्याप पंचनामे पार पडलेले नाहीत, थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मविआ सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर 50 टक्के कमी करावेत अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत. 

सीएनजी (CNG) पीएनजीवरचे (PNG) कर मविआ सरकारने कमी केले पण ईडी सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत उलट सीएनजी 84 रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केलं. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच या सरकारला काम करु दिले गेलं नाही. सातत्याने सरकारच्या कामात खोडा घालणे, राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा सारखे मुद्दे जाणीवपूर्वक काढले गेले. मविआ सरकार, महाराष्ट्र व मुंबईला बदनाम करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. राजभवनच्या माध्यमातूनही समांतर सरकार चालवले गेले. कोरोनाच्या संकटातच मविआ सरकारी दोन वर्ष गेली पण जगाला हेवा वाटावा असे काम कोविड संकटात मविआ सरकारने केले पण ते सरकार पाडण्यातच विरोधक व्यस्त होते. 

शेवटी कटकारस्थान करून ईडी सरकार आले आणि सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारच खुलेआमपणे हातपाय तोड्याची भाषा करू लागले, पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावण्याची भाषा सुरु झाली. दादरमध्ये गणेशोत्सव काळात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केला पण या पैकी एकाही घटनेत कायदेशीर कारवाई करुन सरकारी गुंडगिरीला चाप लावला नाही, असेही पटोले म्हणाले.