महत्त्वाची बातमी! 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत

Updated: Sep 1, 2021, 06:14 PM IST
महत्त्वाची बातमी! 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक title=

मुंबई : कोविड-19 विषाणूचे नवीन आणि वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, जे आंतरराष्ट्रीय प्रवासी यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून किंवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवीन मार्गदर्शक सूचना

- यूके, युरोप, मध्यपूर्व,  दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या सर्व देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.

- चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात येत आहेत. (जसे की, पूर्ण / दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, 65 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक इत्यादी)

- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणारे अथवा आगमन होवून पुढे जाण्यासाठी दुसरे विमान निवडलेले इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी (यूके, युरोप, मध्यपूर्व,  दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे वगळता) यांना मागील 72 तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतर ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. ही तरतूद देखील दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे.

- सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील स्वयंघोषणा-पत्र (self-declaration form) तसेच हमीपत्र (undertaking) भरुन मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना 17 दिवस गृह विलगीकरणात (home quarantine) राहणे बंधनकारक असेल.

सर्व मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी, मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱया यंत्रणेकडून, प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार, म्हणजे दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी लागू असलेले प्रति चाचणी रुपये 600 याप्रमाणे चाचणीसाठीचे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे म्हणून प्रतितास सुमारे 600 प्रवाशांची चाचणी करता येईल, इतक्या क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे.