CAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली.  

Updated: Dec 26, 2019, 03:19 PM IST
CAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर title=

मुंबई : मोदी सरकारने सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (CAA) बदल केले आहेत. तसेच राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (NRC) कायदा केला आहे. यावरुन देशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चा काढण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांनी निदर्शने करत मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली. मोदी सरकारने केलेल्या कायद्याला कोणी विरोध करीत असेल तर त्यांचे नागरिकत्व काढून घ्यायचा डाव भाजप सरकारचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. सरकार विरोधात लढल पाहिजे, आंदोलन केली पाहिजेत असा निर्धार करताना हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

'म्हणून डाव्याच्या मोर्चाला परवानगी नाकारली!'

मुंबई पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आंदोलन करणार, हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा, असे आव्हान देत त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते. नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. दादरच्या खोदादाद सर्कल येथे हे आंदोलन सुरु होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होत्या. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादर टीटी सर्कल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. CAA लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. या आंदोलनांने आम्ही विरोध करत आहोत. आता हे धरण आंदोलन थांबवतोय, असे सांगत त्यांनी आपले आंदोलन आटोपते घेतले.
 
मोदी आणि अमित शाह हे खोटे बोलत आहेत. संसदेत चर्चा झालेली नाही असे एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे चर्चा झाली असे सांगतात. देशाच्या जनतेशी खोटे बोलणाऱ्यांचा मोदी राजीनामा घेणार का किंवा त्यांचे खाते काढून घेणार का, असा सवाल मोदींना प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. १५ लाख रुपये देणार हे खोट विधान केले. त्याचप्रमाणे हे दोघे थापा मारत आहे. हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहेच. त्याचसोबत हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात. हा आरएसएस आणि भाजपचा मोठा डाव आहे. जो या का द्याला विरोध करेल त्यांचे नागरिकत्व काढून घ्यायचा यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांनी जागा बघितलीच नाही तर बांधून ठेवली आहे. CAA आणि NRC राबवायचे नाही तर डिटेशन कॅम्प कशासाठी? एवढे सगळे सुरू असताना 'सावरकर'मध्ये कशाला आणले. जर हा कायदा जनतेविरोधात नाही. मग नवी मुंबईत नेरुळ, खारघर येथे डिटेशन कॅम्प कशासाठी, तेथे जागा कशाला घेतली आहे. कारण स्वत:चे राज्य निर्माण करण्यासाठी आणि राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकत्व काढले की मताचा अधिकार गेला. त्यानंतर मुंबईतील लोक या कॅम्पमध्ये ठेवले जातील, अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली.