१७० हून अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकू - आशिष शेलार

३० नोव्हेंबरला भाजप विश्वासदर्शक ठराव जिंकेल....

Updated: Nov 24, 2019, 11:02 AM IST
१७० हून अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकू - आशिष शेलार title=

मुंबई : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं शिकवलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करतील. संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास दाखवला आहे. चोरुन शपथविधी घेतला असं म्हणणाऱ्यांना सांगतो. ती पहाट असते. आम्ही सकाळी ६ ला संघाच्या शाखेत जाणारे लोकं आहेत. पहाटे राम प्रहराची वेळ असते. पण जे रामच विसरले त्यांना हे काय कळणार.' असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे,

'रात्रीच्या वेळी काळ्या काचेच्या गाडीत लोकं अहमत पटेलांना भेटायला जातात. संजय राऊत यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज त्यांनी किमान त्यांची बाजू मांडली. आणीबाणी ही भयंकर होती असं त्यांनी मानलं. म्हणजेच महाआघाडी होण्याआधीच जे इंदिरा गांधीवर शरसंधान करतात. ते नंतर काय करतील हे महाराष्ट्राची जनता पाहिलं. आमच्या दृष्टीकोनातून तर आणीबाणी काळा दिवसच आहे. ३० नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करुन महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही स्थिर सरकार देऊ.' असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. सुप्रीम कोर्टाचा जो ही निर्णय येईल तो येईल. पण आम्ही १७० हून अधिक आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध करु.' असा दावा त्यांनी केला आहे.

'उद्या नागरिकता संशोधन विधेयक संसदेत सादर होईल. जे लोकं मुंबईत, देशात अवैधपणे भारतात राहतात. बांगलादेश किंवा इतर देशातील लोकांना देशातून बाहेर काढण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. आता शिवसेना उद्या काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. सत्तेसाठी शिवसेना काँग्रेससोबत याला विरोध करेल का हे पाहावं लागेल. असं देखील शेलारांनी म्हटलं आहे.