पार्ट्या करताना कुठे होती मराठी अस्मिता; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

कंगनाला 'उपरी' म्हणणाऱ्या शिवसेनेला निशाण्यावर घेत ... 

Updated: Sep 7, 2020, 01:10 PM IST
पार्ट्या करताना कुठे होती मराठी अस्मिता; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री KANGNA RANAUT कंगना राणौत हिनं काही दिवसांपूर्वी मुंबई, महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांचा रोष ओढावला. शिवसेनेनंही कंगनाविरोधी सूर आळवणं सुरुच ठेवलं आहे. यातच आता विरोधी पक्षांनी उडी घेत, शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

कंगनाला 'उपरी' म्हणणाऱ्या शिवसेनेला निशाण्यावर घेत भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कंगनावर करण्याच आलेली हीच टीका पाहता, नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेनेवरच हल्लाबोल केला. 'कंगनासारखे लोक उपरे आणि डिनो, गोमेज, जॅकलिन, पटनी अस्सल मराठी!! हो ना? टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती ?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

आदित्य ठाकरे यांचा बॉलिवू़ड वर्तुळात असणारा वावर आणि त्यांचा मित्रपरिवार पाहता नितेश राणे यांनी नाव न घेता या ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली. आता त्यांच्या या ट्विटवर शिवसेनेतून कोणाची काही प्रतिक्रिया येणार का, याकडे अनेकांचं लक्ष आहे. 

 

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून यंदाच्या वेळी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यापुढं असणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शिवाय मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मरीशी करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगनाचा सर्व पक्षांनी विरोध करत मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्या कंगनाची चौकशी व्हावी अशी आग्रही भूमिकाही शिवसेनेकडून मांडण्यात आली. ज्यानंतर नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काही प्रश्न मांडले.