लता मंगेशकर, सचिन यांच्या ट्विटची चौकशी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली - अनिल देशमुख

शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest ) मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

Updated: Feb 16, 2021, 09:00 AM IST
लता मंगेशकर, सचिन यांच्या ट्विटची चौकशी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली - अनिल देशमुख  title=
Pic Courtesy : ANIL DESHMUKH @twitter

मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest ) मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. तर या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग ((Bjp It Cell Inquiry) असण्याची शक्यता आहे. ही शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर दिले आहे. लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) आमचे दैवत आहे. तर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) आमचा लाडका आहे, असे सांगत चौकशीची अफवा विरोधकांनी पसरवली, असे ते म्हणाले. (Bjp It Cell Inquiry Home Minister Anil Deshmukh)

स्वर साम्राज्ञी लतादिदी हे आमचं दैवत आहे. उभ्या देशाला जल्लोषाची संधी देणारा सचिन तेंडुलकर आमचा लाडका आहे. यांच्या ट्विटची चौकशी मी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली. तीही मी कोरोनाग्रस्त असताना. चाराणे-आठाण्यात वाट्टेल त्या अफवा पसरवणाऱ्या फेक फॅक्टरी वाल्यांनो काळजी करा, कायदे कडक आहेत, असा इशारा भाजप आणि भाजपच्या आयटी सेलला अनिल देशमुख यांनी दिला आहे.

कोरोनातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  सेलिब्रीटी ट्विटच्या बाबतीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. त्या ट्विटमागे भाजपच्या आयटी सेलची काय भूमिका आहे, हे तपासण्यासाठी  चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनुसार भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि इतर बारा जणांचा यात समावेश असल्याचे दिसून येत आहे. सखोल चौकशी सुरू आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.  

पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य

बीड येथील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच सत्य परिस्थिती समोर येईल. त्या अहवालानुसारच पुढील कारवाई होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.  या प्रकरणबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे.पोलिसांच्या चौकशीनंतर राज्य सरकार कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल, असेही देशमुख यांनी सांगितले.