मविआ सरकारला सत्तेची मस्ती आणि अहंकार, सुधीर मुनगंटीवार संतापले

भाजपा राज्यभर करणार एल्गार आंदोलन

Updated: Dec 29, 2021, 07:51 PM IST
मविआ सरकारला सत्तेची मस्ती आणि अहंकार, सुधीर मुनगंटीवार संतापले title=

मुंबई : घटनाबाह्य कृती, लोकशाही विरोध आतंक, सत्तेची मस्ती, आणि प्रशासनाचा दुरुपयोग अश्या कितीतरी अनैतिक कृत्यांची शृंखला महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे. चेहरा लोकशाहीचा आणि कृती मात्र हुकूमशाहीची असे मुख्यमंत्र्यांविना अधिवेशन चालविणारे सरकार राज्यातील जनतेला संकटाच्या दरीत लोटत आहे असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टी या अहंकारी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, यासाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

शिवसेना आणि महाराष्ट्राचं दुर्देव
सर्व प्रकारचे विक्रम मोडीत काढत ठाकरे सरकारने 'मुख्यमंत्र्यांशिवाय अधिवेशन' हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 27 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकीर्दीत असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच बघितला आहे, असं सांगून ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हट्ट करून अटक केली, तुरुंगात टाकण्याची भाषा केली त्यांनाच मांडीला मांडी लावून बाळासाहेबांचे सुपुत्र मार्गदर्शकाच्या भूमिकेत बसवतात हे शिवसेना आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्यपालांना अपमानजनक वागणूक
राज्याच्या राज्यपालांना सतत अपमानजनक पद्धतीने वागणूक देणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, विमानातून त्यांना उतरविणे या सगळ्या बाबी राज्याच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत याकडेही लक्ष वेधत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील पैशांचा विनियोग चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केलं. जनतेच्या हिताच्या विधेयकांवर विरोधी बाकावरून हितकारक सूचना दिल्यानंतरही त्यावर गांभीर्य दाखविले गेले नाही याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं.

भाजपचं एल्गार आंदोलन
घटनाबाह्य कृतीची परंपरा महाविकास आघाडी सरकारने सुरू केली तिचा शेवट भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत या आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन देखील सुधीक मुनगंटीवार यांनी केलं आहे.

फडणवीस सरकारच्या काळात राज्याला आर्थिक शिस्त
फडणवीस सरकारच्या काळात राज्याला आर्थिक शिस्त लावली. फडणवीस सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार वाढला हा अपप्रचार आहे. फडणवीस सरकार सत्तेत आले त्यावेळी राज्यावर 2 लाख 94 हजार 261 कोटींचे कर्ज राज्यावर होते. आम्ही सत्ता सोडली त्यावेळी राज्य 4 लाख 51 हजार 114 कोटींचे कर्ज होते 1 लाख 57 हजार 53 कोटींचे कर्ज घेतले. या 2 वर्षात या 6 लाख 15 हजार 170 कोटींचे कर्ज आमच्या काळात कर्जातील 1 लाख 57 हजार 53 कोटींची वाढ झाली, मात्र या सरकारच्या काळात 1 लाख 64 हजार 56 कोटींचे कर्ज वाढले, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.