अर्णब गोस्वामींवर मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल

अर्णब गोस्वामी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मात्र मुंबईत दाखल झाला आहे.

Updated: Nov 4, 2020, 07:17 PM IST
अर्णब गोस्वामींवर मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल title=

मुंबई  : रिपब्लिकचे चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मात्र मुंबईत दाखल झाला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केली जात होती,  त्यावेळी त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याबद्दल हा गुन्हा नोंदवला आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

दुसरीकडे या अटकेप्रकरणी भाजपाने ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. ही आणीबाणी सदृश्य परिस्थिती उद्धव ठाकरे सरकारने तयार केली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक का? - अनिल परब यांनी दिले उत्तर

अर्णब गोस्वामी यांना अटक का करण्यात आली, यावर परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे सांगितले आहेत.

अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक, ही त्यांच्या विरूद्ध २०१८ मध्ये अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी जो गुन्हा होता त्या प्रकरणी झाली आहे. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली, तेव्हा त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. या सुसाईड नोटवरुन जो तपास व्हायला हवा होता, तो झाला नाही.

अन्वय नाईक यांच्या पत्नीने या प्रकरणी कोर्टात दाद मागितली. कोर्टाने पोलिसांना या प्रकरणी तपासाचे आदेश दिले. आता या प्रकरणात अटक झाल्यावर येथे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न येत नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.