विकेण्डला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

शनिवारी-रविवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता... मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

Updated: Feb 17, 2022, 06:40 PM IST
विकेण्डला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट title=

अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. एकीकडे दिवसभर उकाडा रात्री थंडी आणि आता त्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचं संकट अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात 19 आणि 20 फेब्रवावारीला अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीच अवकाळीमुळे बळीराजा आधीच कोलमडून पडला. आता पुन्हा अवकाळीनं धुमाकूळ घातला तर शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

पुढील तीन दिवस पश्चिम विदर्भात तूरळक ठिकाणी हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  रब्बी हंगामातील गहू हरभरा, कांदा आणि संत्रा पिकांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.