उपराजधानीला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी

पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा

Updated: May 15, 2019, 04:13 PM IST
उपराजधानीला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा करणा-या पेंच प्रकल्प तसेच कन्हान नदीत अत्यल्प पाणीसाठा असून १० जुनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीत पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. वास्तविक पाण्याची समस्या गंभीर होईपर्यंत महापालिका झोपा काढत होती. आता उशीराने जाग आल्यानंतर महापालिकेकडून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा, पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महापौर नंदा जिचकार यांनी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला सोमवारी भेट दिली. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर महापालिकेकडून नागपूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान अवैधपणे पाणी व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस कारवाईची तयारीही महापालिकेने केली आहे.