टोमॅटोही महागाईने लालेलाल; राज्यातील बहुतांश शहरांत शंभरीपार

उष्णतेच्या लाटेमुळे अनपेक्षित हवामानाचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून टोमॅटोलाही त्याचा फटका बसला आहे. उत्पादनावर परिणाम होत असल्याने पुरवठा खूपच कमी झाला आहे. तर मागणी मात्र वाढतच आहे.

Updated: Jun 3, 2022, 03:47 PM IST
टोमॅटोही महागाईने लालेलाल; राज्यातील बहुतांश शहरांत शंभरीपार title=

नवी दिल्ली : बटाटे, कांद्यानंतर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. अवघ्या महिनाभरात टोमॅटोचे भाव दुप्पट-तिप्पट झाले आहेत.

सध्या देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 100 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेले आहेत. आधीच महागाईने हैराण झालेल्या लोकांसाठी टोमॅटोच्या भाववाढीचा फटका सहन करावा लागतोय. मात्र, दुसरीकडे चांगली बाब म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

महाराष्ट्र हे देशातील एक असे राज्य आहे जिथे टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तपासात मोठा उत्पादक असूनही पुण्यासह राज्यातील अनेक शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोची 100 रुपये किलोच्या वर विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, बारामती आदी शहरांमध्ये टोमॅटोने किलोमागे 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्यातील शहरांमधील टोमॅटोचे भाव

                 होलसेल    किरकोळ

पुणे:             60         80-120

नाशिक:        50         80-100
नागपुर:         75        120
अकोला:        80        120
वाशिम:         70         90
नांदेड़:          70         90
बारामती:       55        100
अहमदनगर:  45         60
यवतमाळ:      75         90
औरंगाबाद:     40        80

टोमॅटोचा भाव शेतकऱ्यांसाठी ठरला वरदान 

टोमॅटोचे वाढलेले भाव सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अस्वस्थ झाले होते. आता टोमॅटोच्या दराने त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून काढले आहे.