...तर वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची पर्यावरण मंत्र्यांना विनंती

घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून...

Updated: Jul 15, 2020, 01:39 PM IST
...तर वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची पर्यावरण मंत्र्यांना विनंती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगिले जाते ही बाब लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला. या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. 

पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास... 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या १०० गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

'१९७३-७४ मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो.२७६८.५२ चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील १६ गावे आणि या गाभ्याबाहेरील ६ गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या १० किमी परीघातालीच होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने तेथील वन्य जीव झपाट्याने वाढल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. मुख्य म्हणजे भारतीय वन्यजीव संस्थेनेदेखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करण्यासंबंधीची सूचना केली आहे.