शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..."

Shivsena Symbol Row : शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं आहे. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात मोठा दावा केला असून संजय राऊत यांनी धमकावल्यामुळेच आपण राज्यात परतलो नव्हतो असं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.   

Updated: Jan 31, 2023, 11:04 AM IST
शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..." title=

Shivsena Symbol Issue : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सोमवारी निवडणूक आयोगासमोर (Election Commmission) लेखी निवदेन सादर केलं. शिवसेना (Shivsena) पक्षनाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह (Election Symbol) या वादावर लेखी निवेदन सादर करण्यास आयोगाने सांगितलं होतं. ठाकरे गटाने (Thackery Faction) ई-मेलद्वारे तर शिंदे गटाच्या वकिलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन लेखी प्रत्युत्तर दिलं. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात शिवसेना खासदार संजय राऊतांमुळे आपण परराज्यात गेलो होतो असा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर संजय राऊतांनीही उत्तर दिलं आहे. 

शिंदे गटाचा दावा काय? 

संजय राऊतांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या उत्तरात केला आहे. आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणं कठीण होईल या राऊतांच्या विधानाचा दाखला शिंदे गटाने दिला आहे. तसंच सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवरही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता हे शिंदे गटाने नमूद केलं आहे. 

संजय राऊतांनी दिलं उत्तर - 

संजय राऊतांना शिंदे गटाच्या दाव्याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी ते दरवेळी भूमिका बदललात अशी टीका केली. "ते प्रत्येकवेळी भूमिका बदलतात. खोके मिळाल्यामुळे ते सोडून गेले. धमकीचा विषय आता आला आहे. ज्या भाषणाचा उल्लेख केला जात आहे ते सूरतमधून गुवाहाटीला गेलयावर केलं आहे. ते भाषण काळजीपूर्वक पाहिल्यास मी काय बोललो होतो हे कळेल", असं संजय राऊत यांनी सांगितलं.  

"यांचे पार्श्वभाग सुजवून काढा असं विधान त्यांच्याच प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन केलं होतं. नंतर त्याच जाऊन शिंदे गटात सामील झाल्या," याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. हे यांचं वैफल्य आहे, ते प्रत्येक लढाई हारणार आहेत असंही राऊत म्हणाले. 

अर्थसंकल्पावर भाष्य

"दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो आणि भरधोस घोषणा केल्या जातात. चार, पाच उद्योगपती, कॉर्पोरेट क्षेत्रांना समोर ठेवून अर्थसंकल्प मांडू नये. सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला तर स्वागत आहे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे देश खड्ड्यात जाईल," असं संजय राऊत म्हणाले.

जनता अर्थसंकल्पाकडे कशाप्रकारे पाहते तसंच आम्ही पाहणार आहोत. आम्ही अदानी, अंबानी यांच्या विचाराप्रमाणे काम करणार नाही. गरिब, शेतकरी यांच्यासाठी काय करणार हे महत्त्वाचं आहे. आज देश आर्थिक संकटात आहे. हिंडेन्सबर्ग प्रकरणानंतर देशाची अर्थव्यवस्था ध्वस्त होत असताना आम्ही ताकद मिळावी अशी आशा करतो असं संजय राऊतांनी सांगितलं.