पुन्हा युतीचे संकेत? काल चंद्रकांत पाटील, आज मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

शिवसेना-भाजपच्या  युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Sep 17, 2021, 12:55 PM IST
पुन्हा युतीचे संकेत? काल चंद्रकांत पाटील, आज मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान title=

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) मुख्यमंत्रिपदावरून भाजपची (BJP) साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप झाले. पण आता दोन वर्षांनी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगू लागली आहे. आणि याला कारण ठरलंय,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य (CM Udhav Thackeray).  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 

औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  मोठे विधान केले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray made a big statement) व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत असं विधान केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांचं विधान म्हणजे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत तर नाहीत ना, असी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

माजी मंत्री म्हणू नका 

दरम्यान, कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केलं होतं.  माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. देहूमध्ये एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी मंचावरून सूत्रसंचालकानं त्यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्यावर लागलीच चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका असं विधान केलं. येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल अशी पुष्टी जोडायलाही ते विसरले नाहीत. 

काल चंद्रकांत पाटील आणि आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन, शिवसेना-भाजपच्या  युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.