'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात

पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुगली राजकारण सुरु असतानाच आता समृद्धी महामार्ग अपघातावरुन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

अरूण म्हेत्रे | Updated: Jul 1, 2023, 05:01 PM IST
'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात title=

Samruddhi Mahamarga Bus Accident :  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarga Accident) झालेल्या भीषण बस अपघात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरचा हा सर्वात मोठा आणि भीषण अपघात होता. विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस (Vidarbha Travels) लोखंडी पोलला धडकली आणि बसने पेट घेतला. या आगीत साखरझोपेत असलेले प्रवासी होरपळे आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील प्रवासी नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातले होते. समृद्धी महामार्गावरील अपघातावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार
समृद्धी महामार्गावर गेल्या काही काळात अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात आणि हे चित्र काही महिने बघायला मिळतंय. मी त्या रस्त्याने गेलो होतो, त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांचा अनुभव विचारला. यावर लोकांनी या मार्गावर सातत्याने अपघात पाहिला मिळतात, जो अपघातात मृत्यूपावतो तो देवेंद्रवासी होतो, असं लोक सांगतात अश शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अपघाताचं महत्त्वाचं कारण रस्त्याचं काम शास्त्रीय पद्धतीने झालेलं नसावं, ज्यांनी रस्त्यांचं नियोजन केलं, ते लोक दोषी ठरवतात असं शरद पवार यांनी म्हटलंय. 

जे झाले ते वाईट झाले. 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत, असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी आणि अपघाताच्या घटना रोखाव्यात असं शरद पवार यांनी म्हटलंय. रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे. 

सरकारला एक वर्ष
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला 30 जूनला एक वर्ष पूर्ण झालं. यावर बोलताना शरद पवार यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे का असा प्रश्न उपस्थित केला. महिलांवरील हल्ले, कोयता गँग ह्या राज्य सरकारची देणगी आहे, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात, पण महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलंय. 

पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले माझी गुगली त्यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना कसे कळणार. ते बॉलरला माहिती असते त्यांना जर हे माहिती होते त्यांनी दोन दिवसांनी शपथ विधी का केला? असा सवाल पवारांनी फडणवीस यांना विचारला आहे.