शरद पवार म्हणतात, ''नैराश्य आलेल्या केंद्र सरकारचा कारवाई करण्याचा हा तर नवा पॅटर्न''

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे,  केंद्र सरकारला नैराश्य आलं आहे, यामुळे सरकार सत्तेचा गैरवापर

Updated: Jun 25, 2021, 05:31 PM IST
शरद पवार म्हणतात, ''नैराश्य आलेल्या केंद्र सरकारचा कारवाई करण्याचा हा तर नवा पॅटर्न'' title=

पुणे  : राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे,  केंद्र सरकारला नैराश्य आलं आहे, यामुळे सरकार सत्तेचा गैरवापर करुन ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे. एवढंच नाही शरद पवार यांनी पुढे म्हटलं आहे, ''केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरु केला आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ईडीच्या ज्या धाडी सुरु आहेत, त्याची आम्हाला चिंता वाटण्याचं काही कारण नाही.

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर नैराश्यातून करत आहे,  यातून सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान आज मुंबईत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने धाडी टाकल्या. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक पालांडे यांची देखील चौकशी काही तास करण्यात आली.

अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी देखील ईडीने धाडी टाकल्या आहेत, त्या  निवासासमोर अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केली आहेत, दुसरीकडे अनिल देशमुख यांच्या अटकेची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.