स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार

शरद पवार यांची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली

Updated: Jun 16, 2020, 06:37 PM IST
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार title=

दीपक भातुसे, मुंबई : शरद पवारांनी विधानपरिषद आमदारकीची दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. राजू शेट्टी यांनी आज बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा शरद पवारांनी शब्द दिला होता. तो शब्द पवारांनी पूर्ण केला आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहेत. या जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. या 4 जागांपैकी राष्ट्रवादीकडून एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आमदार होण्याची ऑफर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिली होती. आज यासंदर्भात राजू शेट्टी यांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली. या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारली आहे. त्यामुळे आता राजू शेट्टी आमदार होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मात्र सत्ता आल्यानंतर या दोन्ही पक्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेककडे  दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नाराजीचा सूर होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी देण्यात आली नाही. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळावी असा मेल शेट्टी यांनी पवार यांना केला होता. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने आता संधी देऊन न्याय दिला.

 

शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीतून राजू शेट्टी यांचं नेतृत्व पुढे आले आहे. संघटनेतील मतभेदानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. आधी ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य बनले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी शिरोळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा पाठोपाठच्या दोन निवडणुकीत राजू शेट्टी लोकसभेवर निवडून गेले होते. 2019 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराकडून राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानपरिषदेवर त्यांची नियुक्ती होणार असल्याने पुन्हा एकदा ते विधिमंडळात परतणार आहेत.