धक्कादायक! कांदा घेऊन जाणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू

Pune News : ट्रॅक्टर खाली चिरडला गेल्यामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या अपघातामुळे शेतकऱ्याने जीव गमावला आहे.

Updated: Mar 31, 2023, 09:46 AM IST
धक्कादायक! कांदा घेऊन जाणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) तरुण शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याच्या शिरूर (Shirur) तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे हा भीषण अपघात झाला. कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरच्या (tractor) अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर खाली चिरडला गेल्यामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या अपघातामुळे शेतकऱ्याने जीव गमावला आहे.

भूषण रणदिवे (31) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. भूषण रणदिवे हे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असतानाच हा अपघात झाला आहे. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने तो खड्ड्यात जाऊन उलटला. या दुर्दैवी अपघातात ट्रक चालवणाऱ्या भूषण रणदिवे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भूषम यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

बार्शी- कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दुसरीकडे बार्शी- कुर्डूवाडी रोडवर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. शेंद्री फाट्याजवळ ही घटना घडली आहे. मधुसूदन मुरलीधर जाधव, ऋषिकेश संतोष जाधव अशी मृतांची नावे असल्याची समोर आले आहे. दोघेही पंढरपूर तालुक्यातील रहिवासी आहे. 

मधुसूदन आणि ऋषिकेश जाधव हे कुर्डूवाडीवरून बार्शीच्या दिशेने निघाले होते. शेंद्री फाट्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रकने मुलाला चिरडले

दुकानातून घरी जात असलेल्या नऊ वर्षीय मुलाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना गोंदिया शहरातील वाजपाई वॉर्डामध्ये घडली आहे. या अपघातामध्ये मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जामावाने ट्रक पेटवून दिला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. राफन अफरोज शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान, रामनवमीचा उत्सव तसेच रमजान महिना सुरू असल्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.