मुलाने वडिलांचा खून केला, मृतदेह सेल्फी पॉईंट परिसरात टाकून पळ काढला

मावसभावाच्या मदतीने मुलाने वडिलांची केली हत्या, कारण होतं... 

Updated: Jun 17, 2022, 09:09 PM IST
मुलाने वडिलांचा खून केला, मृतदेह सेल्फी पॉईंट परिसरात टाकून पळ काढला title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात समोर आली आहे. मद्यप्राशन करून त्रास देत असल्याच्या कारणातून मुलाने मावसभावाच्या साथीने आपल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेह दुचाकीवरून मध्यरात्री बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंट परिसरात टाकून दिला होता. 

अतिशय कौशल्यपुर्वक तपास करून कोंढवा पोलिसांनी खूनाचा छडा लावून राज्याबाहेर रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मुलाला आणि त्याच्या मावस भावाला रेल्वे स्टेशन इथून अटक केली आहे.

सोनू पवन शर्मा (वय.25,रा.मानाजीनगर नर्‍हेगाव मुळ मध्यप्रदेश) आणि शैलेंद्र गोवर्धन अहिरवार (वय.22,रा. नर्‍हेगाव मुळ मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर पवन देबू शर्मा (वय.40,रा. मानाजीनगर नर्‍हे) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंट परिसरात अज्ञाक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोंढवा पोलिसांनी मृतदेहाच्या फोटोवरून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास सुरूवात केली होती. 14 जूनलापोलिस अंमलदार तुषार अल्हाट यांना खबऱ्यामार्फत खून झालेल्या व्यक्तीचं नाव पवन शर्मा असून, तो मिस्त्री काम करत असल्याची माहिती मिळाली.

मृत व्यक्ती नर्‍हे इथल्या मानाजीनर इथं राहण्यास आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शर्मा याच्या घराचा पत्ता शोधून काढला. त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, मुलगा सोनू आणि तिच्या बहिणीचा मुलगा शैलेंद्र याच्यासह एकत्र रहात असल्याचं तिने सांगितलं. पवन हा दारु पिऊन आल्यानंतर तिला आणि तिच्या मुलाला नेहमीच मारहाण करत असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली. 

13 जून रोजी दारु पिऊन आल्यानंतर पवन याने दोघांना मारहाण केली होती. त्या रात्रीपासून मुलगा आणि बहीणीचा मुलगा दोघे घरी आले आले नव्हते. पोलिसांना संशय आल्याने दोघांचा शोध सुरू घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी दोघे रेल्वे स्टेशन इथून मुळ गावी मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समजलं. 

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खूनाची कबुली दिली. 

हत्या करण्यापुर्वी मृतदेह टाकण्यासाठी केली रेकी
पवन शर्मा हा मुलगा सोनू आणि त्याची आई यशोदा या दोघांना दारु पिऊन आल्यानंतर सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. सतत होणार्‍या त्रासाला सोनू कंटाळा होता. त्यातूनच त्याने वडील पवन याचा खून करण्याची योजना आखली. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कोठे टाकायचा यासाठी विविध ठिकाणची पाहणी केली. 

त्यासाठी त्यांनी बोपदेव घाटाची निवड केली. मध्यरात्रीच्यावेळी पवन याचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर दुचाकीवरूनच त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिला. तसंच पोलिस आपल्याला पकडू नयेत म्हणून याची देखील खबरदारी घेतली. मात्र पोलिसांनी दोघांना दरभंगा एक्सप्रेसमधून बेड्या ठोकल्या.