गृहिणींची फोडणी महागणार; टोमॅटो, भाज्यांनंतर लसणाचे दर वाढले, एक किलो तब्बल...

Garlic Price Hike: शाकाहारी असो किंवा मांसाहारी, लसणाचा वापर दोन्ही प्रकारच्या जेवणात होतोच. त्यामुळे बाजारात लसणाची मागणी वाढत आहे. यामुळं गृहिणींचे बजेट महागणार आहे.

Updated: Jul 14, 2023, 03:38 PM IST
 गृहिणींची फोडणी महागणार; टोमॅटो, भाज्यांनंतर लसणाचे दर वाढले, एक किलो तब्बल... title=
Navi Mumbai Garlic prices surge as supply shortage persists

Garlic Price Hike: टोमॅटो (Tomato Price Hike) आणि हिरव्या भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना किचनचे बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच आता लसणाच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. एक किलो लसूणाची (Garlic Price) किंमत 230 किलो इतकी आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लसणाच्या किंमतीत 25 ते 30 % वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वाढ झाली आहे. (Garlic Price Hike In Mumbai)

लसूण हा भारतीयांच्या खाद्यपदार्थातील महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणाची फोडणी दिल्याशिवाय डाळ व भाजीचा चव येत नाही. पण आता लसणाचे भाव वाढल्याने किचनचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. वाशीतील मार्केटमध्ये येणारा लसूण हा राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातील आहे. या वर्षी लसणाच्या उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी त्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळंच लसणाच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

दरम्यान, वाशीच्या मार्केटमध्ये दिवसभरात 20 ट्रक भरुन लसूण येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा आकडा घटून 10वर आला. मात्र, गेल्या गुरुवारपासून फक्त 7 ट्रक लसूण वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. महिन्याच्या सुरुवातीला लसणाची किंमत 150 ते 180 किलो इतकी होती. मात्र, गेल्या 4-5 दिवसांतच किंमत 240 रुपये किलो इतकी झाली आहे. 

मान्सूनचे आगमन होताच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटोनंतर कोथिंबीरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्याच्या किंमतीही वधारल्या आहेत. 

टोमॅटो स्वस्त होणार

येत्या काही दिवसांत लवकरच टोमॅटोचे दर कमी होणार आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. तसंच, मान्सूनच्या कालावधीत भाजीपाल्याची वाहतूक करण्यास अडचणी येतात. त्यामुळं देखील दरवाढ होते. तसंच, दिल्ली आणि परिसरात विक्रीसाठी येणारे टोमॅटो प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून येतात. शिवाय टोमॅटोच्या उत्पादनात दक्षिणेकडील राज्यही आघाडीवर आहेत.  त्यामुळं येत्या काही वाढात टोमॅटोचे भाव उतरण्याची शक्यता आहे.