'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा असं आवाहन केलं आहे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा असं राज ठाकरे म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 2, 2024, 01:10 PM IST
'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...' title=

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) भेटायला गेलो तेव्हा हे होणार नाही असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. यामध्ये फार तांत्रिक बाबी आहेत. कोणतंही राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकणार नाही. केंद्राला प्रत्येक राज्याचा विचार करावा लागेल. ते काही इतकं सोपं नाही असं राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 

यावेळी त्यांनी मराठा समाजाला वस्तुस्थिती तपासण्याचं आवाहनही केलं. ते म्हणाले की, "मराठा बांधव, भगिनींनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा. मुख्यमंत्री तिथे आले आणि विजयोत्सव साजरा कऱण्यात आला. पण तिथे असणाऱ्यांना काय विजय मिळाला, कोणता विजय ते तरी कळू देत. मोर्च्यात गेलेल्यांना काय मिळालं ते कळालं का?" मिळालं आहे तर मग पुन्हा उपोषणासला का बसत आहात अशी विचारणाही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. 

अयोध्या राम मंदिराचा भाजपाला फायदा होईल का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कांद्यावर निवडणूक होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. आताही काय होईल याचा काही अंदाज लावणं कठीण आहे. बाबरी मशीद, दंगली, बॉम्बस्फोट यावेळी झालेलं मतदान रागातून झालं होतं. तेव्हा काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या लोकांनीही भाजपाला मोठ्या प्रमामात मतदान केलं होतं. 2014 लाही रागातून मतदान झालं होतं, एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर समाधानातून किती मतदान होतं हे अजून देशाने पाहिलेलं नाही. आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली आहे. पण उत्तरावर होणारी ही पहिली निवडणूक असेल. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण मी भाजपाचा मतदार नाही असंही म्हणणारे आहेत. 1995 साली महाराष्ट्रातील अनेकांनी शिवसेना, भाजपाला दंगलीच्या पार्श्वभूमवीर मतदान केलं होतं. पण तेच पुढे राहील असं काही नसतं". 

दरम्यान सर्व सुस्थितीत आल्यानंतर आपण अयोध्या राम मंदिरात जाऊ असं स्पष्ट केलं आहे. तोपर्यंत नाशिकचं काळाराम मंदिर आहे असंही ते म्हणाले. 

"प्रत्येक पक्षात गटबाजी असते. सत्तेतली दिसत नाही आणि विरोधी पक्षातली दिसते. सत्तेतले विरोधात आल्यावर ती दिसते. लोकसभा, पालिका निवडणूक आल्यावर त्यांच्यातील तडेही दिसतील. आमचा उघडा कारभार असल्याने दिसतं," असंही उपहासात्मकपणे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून चाचपणी करत आहेत. यावेळी त्यांना पालिका निवडणूक लढवण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवा असं सांगत आहेत. दोन अडीच महिन्यांपासून बऱ्यात मतदारसंघात जाऊन माहिती घेत आहेत. कुठे आणि का लढवायच्या यावर चर्चा सुरु आहे. केंद्रात. राज्यात सत्ता असणारेही चाचपणी करत असतील तर आम्हीही करायला हरकत नाही".

"काही लोकांनी राजकारणात बरीच बर्षं दिली आहेत. पण जर त्यांची राजकीय पोहोच नसेल तर अर्थ नाही. सक्षम लोकांनाच संधी देईन. अन्यथा निवडणूक लढण्यात मला रस नाही. किती वेळा तेच पत्ते पिसत बसणार," असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.