"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला

Mumbai - Nagpur Samruddhi Highway : सुरुवातीपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा अपघातांसाठी चर्चेत आहे. महामार्गाच्या उद्घाटानानंतर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. अनेकांनी या महामार्गाबाबत आणखी काही उपाययोजना करण्याचे सल्ले दिले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jun 18, 2023, 11:45 AM IST
"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला title=

Samruddhi Highway : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील (mumbai nagpur samruddhi mahamarg) अपघातांचे वाढते प्रमाण वाढल्याने हा महामार्ग उद्घाटनापासूनच चर्चेत आहे.  या महामार्गावर (Mumbai–Nagpur Expressway) आतापर्यंत सर्वाधिक अपघात रोड हिप्नोसिस झाल्याचे उघडकीस आले आहे. 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत बरेच अपघात झाले असून अनेकांचे जीव गेला आहे. अनेकांनी यावरुन भाष्य देखील केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही अपघात रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने याच महामार्गावरुन नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे कौतुक केले आहे.

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ‘सियावर रामचंद्र की जय’ या तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी राधिका नागपूरात गेली होती. त्यादरम्यान समृद्धी महामार्गावर आलेला अनुभव तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

रामराज्यातले ‘नल नील‘ श्री नितीनजी गडकरी. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बाल महानाट्य नागपूरात होत आहे. त्याच्या प्रयोजनासाठी, प्रस्तुतीसाठी आमची गाडी समृद्धी महामार्गावर निघाली. मी, माझी मुलगी, मैत्रीण आणि तिची मुलं, असे आम्ही…५६७ किमीचा ‘मक्खन मलाई‘ प्रवास केला. स्त्री शक्ती आणि समृद्धीचा मिलाप जणू. महाराष्ट्रातला हा महामार्ग आम्ही पार करणार होतो. घरचे वर्तमानपत्रात येतात त्या बातम्या वाचून काळजीत होते. पण ज्यांनी महामार्ग पार केलाच नाही तेच अधिक बोलताना दिसले. म्हणून मी माझा अनुभव इथे लिहिते आहे. बोलकं व्हायला हवं. चांगलं ते पोहोचवायलाच हवं. “एकटी ड्राईव्ह करणार?” रामाच्या त्या सेतूवरून खारुताईने सुद्धा आपले योगदान देत प्रवास केलाच की. मग मी का नाही? मी निघाले. हा समृद्धी सेतू आहे जो दोन मोठ्या शहरांना जोडतो. वाटेवरच्या छोट्या शहरांना सुद्धा आपल्या अजस्त्र मार्गाने जोडतो. सरळ आहे. जो नियम पाळतो, सुरक्षित अंतर ठेवून चालवतो, जो ओव्हर स्पीड करत नाही, जो लक्ष विचलित होऊ देत नाही त्याच्यासाठी हा महामार्ग सोप्पा मार्ग आहे. वाईट वाटतं त्यांच्यासाठी ज्यांच्यापर्यंत हा मार्ग पोहोचू शकत नाही. वाईट वाटतं त्या लोकांसाठी ज्यांना चांगलं काही दिसत नाही, बघवत नाही. वाईट वाटतं त्यांच्यासाठी ज्यांना फक्त टीकाच करता येतात. एक सुचवू? वाटेत मुंबईचा वडापाव, पुण्याची बाकरवडी आणि नागपूरची संत्री मिळतील अशी सोय करा म्हणजे खारुताई खुश! नितीनजी असे हजारो सेतू राम राज्यात बांधण्यात यावेत. नल आणि नील सारखे काम करण्यासाठी लागणारे “विल” तुमच्याकडे आहे. हाताशी आपलीच वानरसेना आहे. शहराशहराला जोडण्याचे काम तुम्ही चालू केले आहे. आमची खारूताईंची टीम तयार ठेवते तुमच्या कामात वाटा उचलायला. आता तुटतील ती दुर्जनांची मनं, खचतील ती दुष्कृत्य करणाऱ्यांची शरीरे. आमच्या नाटकातलं एक वाक्य आहे, “प्रभु श्रीराम का नाम लेते ही सारे मार्ग खुल जाते हैं”. आमच्या नाटकाला नक्की या," असे राधिका देशपांडेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरु असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहेत. बरेच अपघातात हे खराब टायरमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टायरच्या तपासणीनंतर या महामार्गावर वाहनांना प्रवेश दिला जात आहे.