Maharashtra Politics : सोशल मीडियावर 25000 फॉलोअर्स असल्याशिवाय तिकीट मिळणार नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नाशिक येथे सुरु असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे

Updated: Feb 11, 2023, 12:06 PM IST
Maharashtra Politics : सोशल मीडियावर 25000 फॉलोअर्स असल्याशिवाय तिकीट मिळणार नाही -  देवेंद्र फडणवीस title=
(फोटो सौजन्य - PTI)

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik News) येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक (BJP state executive meeting) पार पडत आहे. या बैठकीला राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, सुकाणू समिती सदस्य असे भाजप सदस्यांनी उपस्थिती लावली आहे. या बैठकीसोबत भाजप (BJP) सदस्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे. यासोबत येणाऱ्या निवडणुकांसाठीही (Election) प्रोत्साहन दिलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

यासोबत भाजपच्या या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने राज्यात विधानसभेसाठी 200 जागांचा नारा दिला आहे. तर लोकसभेच्या 45 जागा निवडून आणण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती समोर आली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा केल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. यासोबत शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवणचे काम भाजप करणार आहे. 

25000 फॉलोअर्स नाहीत तर तिकीट नाही - देवेंद्र फडणवीस

यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसमोर एक वेगळीच अट ठेवली आहे. ज्यांच्या सोशल मीडियावर दररोज पोस्ट नाही, ट्विट नाही तसेच ज्यांना किमान 25000 फॉलोअर्स नाहीत अशांना तिकीटच मिळणार नसल्याचं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उद्घाटन प्रसंगी म्हटलं आहे. फारसा जनाधार नसलेल्या आप सारख्या पक्षाने पंजाबमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ता मिळवली आहे. भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यामध्ये कमी पडतात. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियावर दररोज सक्रिय राहण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनाही तुरुंगात धाडण्याचे षडयंत्र
 
देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर भाजपाचे अन्य नेत्यांनाही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारचे होते. त्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांना अटकेची सुपारी देण्यात आली होती, असा लेखी गौप्य स्फोट भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या राजकीय ठरावात मांडण्यात आला आहे. सध्याच्या सरकारकडून हिंदुत्वाच्या विचारांना सन्मान मिळत आहे विरोधक मात्र शिवाजी महाराजांच्या विचारांची अफजल खान शाहिस्तेखानाच्या अनुनय करत मांडणी करत आहेत, असा आरोप यात करण्यात आलाय. शनिवारी होणाऱ्या बैठकीत राजकीय तसेच सहकार व कृषी विषयक असे दोन ठराव मंजूर करण्यात येणार आहे.