Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

Maharashtra News : महाराष्ट्रात वाढतोय अमली पदार्थांचा विळखा, पालकांनो तरुणांची काळजी घ्या 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 24, 2024, 06:53 AM IST
Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी title=

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.  

तस्करांविरोधात मुंबईत मोहिम

गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने दीड महिन्यापूर्वी ‘नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा शासननिर्णय काढला होता. या टास्क फोर्सचा प्रमुख पोलिस महासंचालकपदाचा अधिकारी असणार असून याचे मुख्यालय पुण्यात आहे. संबंधित पथक सीआयडीअंतर्गत स्वतंत्रपणे काम करणार आहे; परंतु आजही ते कागदावरच आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ड्रग्स

मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेरार्ईन, चरस, मेफेड्रोन या अमलीपदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रूपये किंमतीचे साठे पकडण्यात आले. 

मुंबईत जनजागृती

पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून ती ड्रग्जच्या आहारी जाणार नाहीत. मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकातर्फे वर्षभर जनजागृती सुरू असते. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जागृती केली जाते. सुरुवातीला सिगारेट पिण्याऐवजी ई-सिगारेटचा वापर केला जात होता. इलेक्ट्रिक सेल ॲक्टअंतर्गत अशा सिगारेटसुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला अमलीपदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयांत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.