घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ट्रकने दिली धडक; जळगावतल्या तिघांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident : जळगावमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व भाविक महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वरला जात होते. त्याचवेळी ट्रकने धडक दिल्याने ही भीषण घटना घडली. 

आकाश नेटके | Updated: Mar 15, 2024, 12:40 PM IST
घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ट्रकने दिली धडक; जळगावतल्या तिघांचा जागीच मृत्यू title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावात एका भीषण अपघातात तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर हा अपघात घडला आहे. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनं खोटेनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले होते.

महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वरला जाण्यासाठी निघालेल्या जळगावरच्या भाविकांवर पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला.  जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघात तीन भाविक ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले आहे. वाळूने भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रकने भाविकांना घेऊन जाणाऱ्या क्रुझरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की क्रुझरचा जागीच चुराडा झाला. या भीषण अपघातात भूषण सुभाष खंबायत (वय 35), विजय हिम्मत चौधरी (वय 40), तुषार वासुदेव जाधव (वय 28) यांचा मृत्यू झाला. तर क्रुझरमधील अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील साईनगर या भागातील उभारलेल्या मंदिरात महादेवाच्या पिंडींची स्थापना करायची होती. ती आणण्यासाठी सर्वजण ओंकारेश्वरला निघाले होते. पहाटेच्या सुमारास सर्वजण भगवान शंकरचा जयजयकार करत मार्गस्थ झाले होते. मात्र घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच बांभोरी गावाजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घरी पाचच मिनिटांनी अपघाताची बातमी आल्याने सर्वांनाच जबर धक्का बसला.