वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार

वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

Updated: Nov 18, 2020, 03:23 PM IST
वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार   title=
संग्रहित छाया

नागपूर : वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ संदर्भात ही एक हजार कोटी रुपयांची मदत राज्याने मागितलेली असताना, केंद्राने अवघ्या २६८ कोटींची मदत केली आहे. त्याबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते शब्द ही बोलत नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक संकट आलेले असताना केंद्राची महाराष्ट्र बद्दलची भूमिका दुटप्पी आहे, दुजाभावची आहे, वडेट्टीवार म्हणालेत.

अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे वर्ष आर्थिक, नैसर्गिक सर्व प्रकारचे संकट घेऊन आले आहे. अजून केंद्राने ३८ हजार कोटींचा जीएसटीचा परतावा दिलेला नाही. विदर्भात ज्या चार जिल्ह्यात महापूर आला होता, तिथे आतापर्यंत २०० कोटींचा वाटप शेतकऱ्यांना केला आहे. या चार जिल्ह्यांसाठी ७०० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.मात्र, अजून ही केंद्र सरकारने एका दमडीची मदत केलेली नाही, असे ते म्हणालेत.

महाआघाडी सरकारने दिले, भाजपच्या काळात काय मिळाले?

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, धानाला वाढीव भाव दिले, बोनस दिला. भाजपच्या काळातही धानाला बोनस दिला नव्हता. आता कोणत्या तोंडाने भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मतदान केले नव्हते का, त्यांचे एवढे खासदार जनतेने निवडणून दिले मग भाजप नेते केंद्राकडे शेतकऱ्यांसाठी मदत का मागत नाही, अशी टीका केली आहे. भाजप नेते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत की महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. मात्र, विरोधी पक्ष नेते अर्धवट ज्ञानाने आरोप करत आहेत, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला.

केंद्राचे पाहणी पथक आलेले नाही

केंद्राचे पथक राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी संदर्भात पाहणी करायला आलेलाच नाही, त्यामुळे आमचा पॅकेजच्या मागणीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे कसा जाणार? आतापर्यंत केंद्राचे पाहणी पथक आलेले नाही, तरी ही आता पुढील आठवड्यात मदतीच्या पैकेजसाठी प्रस्ताव पाठवू. आता विरोधी पक्षातल्या वजनदार नेत्यांनी दिल्लीत त्यांचे वजन वापरून मदत मिळवून द्यावी. खरेच त्यांचे वजन आहे का, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

ऊर्जा विभागाने वीज बिलात दिलासा देता येणार नाही असा जो निर्णय घेतला त्यावर मंत्री मंडळात चर्चा केली पाहिजे. या मुद्द्यावर लोकांच्या भावना तीव्र आहेत, आम्हाला लोक भेटतात निवेदन देतात तेव्हा लक्षात येते. या विषयावर काही चुकीचे झालं असेल तर त्यावर ही चर्चा केली पाहिजे, मंत्रिमंडळात चर्चा करण्यासाठी मुद्दा उचलू, असे वडेट्टीवार म्हणाले. 

५० टक्के लोकांचा प्रश्न अजून शिल्लक

आतापर्यंत ५० टक्के लोकांनी, ज्यांची आर्थिक कुवत होती अशानी वीज बिल भरली आहे, तर ५० टक्के लोकांचा प्रश्न अजून शिल्लक आहे, अशा ५० टक्के लोकांवर अन्याय झाला असेल तर त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. एसटीला ज्याप्रमाणे मदत झाली त्या प्रमाणे गरज असेल तर ऊर्जा विभागाला मदत व्हायला पाहिजे, विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजपकडून शेतकऱ्यासंदर्भात गैरसमज

२२९७ कोटी रुपयांची मदत आम्ही दिवाळीच्या आधी दिली. शेतकाऱ्यांसोबत उभं राहण्याचा आम्ही प्रयत्न केला. १०० टक्के कापूस खरेदी आम्ही केली. केंद्र सरकारकडून ३८ हजार कोटी जीएसटीचे घेणे आहे, त्यावर केंद्र बोलत नाही. दुसरीकडे विरोधी पक्ष शेतकऱ्याने संदर्भात गैरसमज निर्माण करत आहे. २००0 कोटी विदर्भाच्या  शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले आहेत. ७०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला मात्र त्यांनी एकही रुपया दिलेला नाही. चक्रीवादळृसाठी तुटपुंजी मदत केंद्राने केली. यावर विरोधक बोलत नाही ते फक्त महाविकास आघाडीवर खापर फोडत आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा घोर अपमान 

किसान सन्मान योजनेत ६००ची मदत केंद्र सरकार करते ती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांचा घोर अपमान केंद्र सरकार करत आहे. पुढच्या आठवड्यात शेतकरी मदतीचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. १० डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्राला मदतीसाठी तीन पत्र लिहिलं पाहणी पथक पाठविण्यासाठी सांगितले आता भाजपवाले म्हणतात केंद्राकडे प्रस्ताव आलाच नाही. आम्ही आता आणखी एक पत्र पाठविणार आहोत. भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. शेतकऱ्यांनची मत मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहेत मात्र त्यांनाच मदत दिली जात नाही. भाजपवाले चुकीचे विधान करतात आणि राज्याला मदत करायची नाही ही त्यांची भूमिका आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, सुशांत प्रकरणात भाजप ने CBI ची मागणी केली आणि तोंडावर पडले. आता पालघर प्रकरणी CBI ची मागणी करत आहे भाजपला तोंडघशी पडण्याची सवय आहे, असे ते म्हणालेत.