राज्यात महायुती का ठरली यशस्वी? जाणून घ्या...

राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या

Updated: May 24, 2019, 12:46 PM IST
राज्यात महायुती का ठरली यशस्वी? जाणून घ्या...  title=

अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : देशात नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीने सर्वांचेच आराखडे अंदाज फोल ठरले, यात शंका नाही. राज्यातही मोदी लाटेचा परिणाम असला तरी आणखी काही मुद्दे, राजकीय हालचाली या राज्यात महायुतीच्या यशासाठी परिणामकारक ठरल्या आणि राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. विशेषतः गेल्या काही महिन्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी, शिस्तबद्ध पद्धतीने केलेली निवडणुकीचे नियोजन यामुळे महायुतीचा विजय झाल्याचे चित्र आहे. तुलनेत काँग्रेस आघाडीच्या अपेक्षा पार धुळीस मिळाल्या. विशेषतः काँग्रेस संघटना आणि निवडणूक पातळीवर भुईसपाट झाली तर शरद पवार यांचे राजकारण पूर्णपणे फेल झाले.

राज्यात महायुतीचे यश नेमकं कशामुळे?

- दुष्काळाचा सामना करण्यासाठी ऑक्टोबरपासून नियोजनबद्ध पावले टाकली गेली

- दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे रोष निर्माण होणार नाही याबाबत पावले उचलण्यात आली

- आधीचे सर्व विसरून योग्य वेळी सेना भाजपाने हातमिळवणी केली

- सेना - भाजपाची पक्ष बांधणी आघाडीच्या तुलनेत कितीतरी उत्तम असल्याने निवडणूक प्रचार नियोजनबद्ध झाला

- गेल्या पाच वर्षातील विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्यात महायुती यशस्वी ठरली

- विशेषतः शहरांमध्ये सुरू असलेली मेट्रोची कामे परिणामकारक ठरली

- मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा प्रभावी ठरला

- शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा करण्याचा निर्णय अत्यंत प्रभावी ठरला

- पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या  खात्यात पीकविमाचे पैसे देण्याची योजना परिणामकारक ठरली

- ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षातील महत्वाचे नेते महायुतीच्या गळाला लागले

- विस्कळीत झालेली काँग्रेस संघटना, ठराविक ठिकाणी अडकून राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस याचा फायदा महायुतीला झाला

- वंचित बहुजन आघाडीचा काही प्रमाणात फायदाही महायुतीला झाला

यामुळे राज्यात महायुतीच्या काही जागा कमी होतील अशी अटकळ बांधली जात असताना राज्यात वर्चस्व ठेवण्यात महायुती चांगलीच यशस्वी ठरली. आता केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता आल्याने पुन्हा एकदा केंद्राकडून आर्थिक असो किंवा राजकीय पाठबळ राज्यात मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथं होण्यासाठी महायुती आणखी ताकद लावेल यात शंका नाही. थोडक्यात केंद्रात एनडीएची सत्ता आल्याने महायुतीसाठी राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे ठरणार नाही.