मृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर पिऊन वेटरचा जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

आशिष अंबाडे | Updated: Jun 23, 2023, 10:37 PM IST
मृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : एखाद्या माणसाचा मृत्यू (Death) कधी आणि कसा होईल याचा काही नेम नाही. मनुष्य किती जगणार आहोत आणि केव्हा मरणार आहे याची कोणीच कल्पना करु शकत नाही. काही वेळा मनुष्य मृत्यूच्या दारातून परत येतो तर काही वेळा धडधाकट माणसाचा अचानक मृत्यू होतो. अशीच काहीशी विचित्र घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात घडली आहे. एक बिअर बारमध्ये (Beer Bar) ग्राहकाने पिऊन अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजरु शहरातल्या सोमनाथपूर मटण मार्केटच्या बाजूला एक बिअर बार आहे. या बिअर बारमध्ये अभय लांडे हा तरुण बिअर पिण्यासाठी आला. त्याने बिअर मागवली आणि ती अर्धवट पिऊन तो बारमधून निघून गेला. टेबलवर अर्धी शिल्लक राहिलेली बिअर बारमधल्या भगवान गेडाम या वेटरने पाहिली. कुणाचं लक्ष नसल्याचं पाहात त्याने ती बिअर पिऊन टाकली. पण बिअर प्यायल्यानंतर भगवान गेडामला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो जागेवरच कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने बारमध्ये खळबळ उडाली. तिथल्या लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. पण भगवान गेडाम याचा जागीच मृत्यू झाला होता.

काय होतं त्या बिअरमध्ये?
भगवान गेडाम याच्या मृत्यूची बातमी पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. वास्तविक बारमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या अभय लांडे या आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने बिअरच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळलं. पण अर्धी बिअर प्यायल्या नंतर अभय लांडेला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो बारमधून बाहेर पडला. बारपासू काही अंतर पार केल्यानंतर तोही जागीच कोसळला. आसपासच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. 

पण अभय लांडेने बिअरच्या बाटलीत विष मिसळलं असल्याचं वेटर भगवान गेडामला माहित नव्हतं. तो ही विषारी बिअर प्यायला आणि दुर्देवाने त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्याला आत्महत्या करायची होती तो जगला आणि ज्याला जगण्याची इच्छा होती त्याला मृत्यूने गाठलं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून विषारी बिअरची बाटली वैद्यकिय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.