मुंबईत 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती; गृहखात्याचा मोठा निर्णय

गृहखात्याकडून मुंबई पोलिसांत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 12, 2023, 05:04 PM IST
मुंबईत 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती; गृहखात्याचा मोठा निर्णय title=

Police Contract Bharti : मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे...गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय...आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.  

पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव

मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा निर्णय घेतलाय. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांतून कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी किंवा भरती प्रक्रियेपर्यंत ही पोलीस भरती केली जाणार आहे.  विशेष म्हणजे या पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव करण्यात आलाय. 

कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

या कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल विचारलाय. सगळ्याच नोक-या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचं काय? कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार केला जातोय असा गंभीर आरोप सुळेंनी केला आहे. तसंच वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिला आहे.

कंत्राटी भरतीवरून नाना पटोलेंचं सरकारवर टीकास्त्र

कंत्राटी भरतीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महायुतीचं आऊटसोर्सिंग सरकार आहे.   तरुणांसोबत, जनतेसोबत सुरक्षेचा खेळखंडोबा करू नये अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

यापूर्वी देखील झाली होती कंत्राटी पोलिस भरतीची चर्चा

यापूर्वी देखील झाली होती कंत्राटी पोलिस भरतीची चर्चा झाली होती.  पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची नाही अशी माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली होती.  मुंबई पोलिस दलात कंत्राटी पोलिस भरतीचे वृत्त खोटे असल्याचं गृहखात्यातल्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितंलय. पोलिस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही असं गृहखात्यातील सूत्रांचं म्हणणंय. मुंबई पोलिस दलाने शासनाच्याच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3 हजार मनुष्यबळ तुर्तास वापरण्याचे ठरविले. जोवर नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोवरच या सेवा घेण्यात येणार असल्याचं गृहखात्याकडून सांगण्यात आले होते.   

आरोग्या विभागात 5000 कंत्राटी कर्मचारी भरले जाणार

वैद्यकीय विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राज्य सरकारकडून हे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी वर्षाला सुमारे 110 कोटी रुपये खर्च येणार आहे. महाराष्ट्रातील 27 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत.