"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!

Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 5, 2024, 08:02 PM IST
"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण! title=
Ajit pawar explanation Over controversial statement on Sharad Pawar

Ajit Pawar Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. त्यावर अनेकांनी टीका केली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय. 

काय म्हणाले अजित पवार?

काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.

काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, असं म्हणत अजितदादांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे, असंही अजित पवार म्हणातात.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? अजितदादा... असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याचा.., असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केला होता. 

दरम्यान, अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकीय वर्तुळात देखील याची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना धारेवर धरलं होतं. तर काँग्रेसने देखील अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.