Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. 

Updated: Nov 23, 2022, 08:37 PM IST
Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली: आदिवासी समाजातील डॉ. भास्कर हलामी (Dr. Bhaskar Halmi) या गडचिरोलीच्या सुपुत्राचा वरिष्ठ वैज्ञानिक (Senior Scientist) म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी (Chirchadi) गावातून थेट अमेरिकेत (America) पोचलेल्या संशोधक पुत्राचे त्याच्या गावकऱ्यांना कौतुक आहे. त्यांच्याशी केलेल्या बातचीतून जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी (Inspiration Story) प्रवासाबद्दल. अगदी हालाखीच्या परिस्थितीतून डॉ. भास्कर हलामी हे अमेरिकेत पोहचले आहेत. अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. सजीवांच्या शरीरात आरएनए नामक सूक्ष्म घटक असतो. हा घटक प्रयोगशाळेत तयार करण्याचे त्यांचे काम कर्करोग, अल्झायमर, हायपरटेन्शन आदींच्या सफल (Research) उपचारात मोलाची भूमिका बजावणारे ठरले आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. आज ते पत्नी व दोन मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. महिनाभरासाठी ते आपल्या गावी चिरचाडी येथे आले आहेत. 

शून्यातून यशाकडे 

घरी हलाखीची परिस्थिती, दोन वेळच्या अन्नासाठी मोठा संघर्ष वाट्याला येऊन देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण (Higher Education) घेत थेट अमेरिकेत वैज्ञानिकपदी निवड झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी गावातील रहिवासी डॉ. भास्कर हलामी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी (Tribal) कुटुंबात जन्मलेले भास्कर हलामी आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणेसुद्धा कठीण होते. मात्र, जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भास्कर यांच्या वडिलांना मुलाने उच्च शिक्षण घ्यावे असे वाटायचे. म्हणून त्यांनी पोटाला चिमटा घेत मुलाला शिकवले. 

हेही वाचा - स्वस्त धान्य रेशनच्या दुकानात येत होतं, पण लोकांच्या घरात जात नव्हतं... अशी झाली पोलखोल

वडिलांना कसनसूर येथील आश्रमशाळेत कामाठी म्हणून नोकरी (Job) लागली. त्याठिकाणीच भास्कर यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर यवतमाळ येथील केळापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात (Chemical) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बीएड देखील केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काही काळ नोकरीदेखील केली. अशातच नागपुरातील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले. काही वर्षे येथे घालावल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून उच्च शिक्षणासाठी परदेशी (Foreign) जाण्यासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

'हा' आहे त्यांचा मानस 

आई-वडिलांच्या इच्छाशक्तीनेच मी आज घडलो असे ते आवर्जून सांगतात. त्यांनी महिनाभराच्या काळात गावात ग्रंथालय सुरू केले आहे. रोज त्याठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतात. पुढेही समाजातील मुलांना शिक्षणासाठी शक्य ती मदत करण्यास ते तयार आहेत. आगामी 5 वर्षात स्वच्छता, शेती (Agriculture) आणि शिक्षण या त्रीसूत्रीवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे.  

मुलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे - डॉ. भास्कर हलामी

समाजातील मुलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे (education and its importance) अशी कळकळ डॉ. भास्कर हलामी यांनी व्यक्त केली. देश आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. तरीही आदिवासी समाजात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाचे महत्त्व दिसून येत नाही. यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिती कारणीभूत असली तरी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावे. यासाठी भास्कर आग्रही आहेत. उंच आभाळात भरारी घेत असताना आपल्या मुळांशी त्यांची जुळलेली नाळ त्यांना इतरांपासून वेगळे करते. त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरलाय.