पाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा

UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 15, 2023, 02:31 PM IST
पाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा title=

UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशच्या (UP News) कुशीनगर भागात एक धक्कादायक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा जिवंत जळून मृत्यू (Fire Accident) झाला आहे. मृतांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. झोपेत असताना ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. घराला आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग विझवण्यात आली मात्र घरातील सहा जणांचा जीवंत जळून मृत्यू झाला होता. पोलिसांनीही (UP Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले आहेत. 

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रामकोला गावात रात्री बारा वाजता हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. नवमी प्रसाद नावाच्या व्यक्तीच्या झोपडीत अचानक आग लागली. या आगीत नवमी प्रसादच्या पत्नीसह पाच मुलांचा जीवंत जळून मृत्यू झाला. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र आगीने हळूहळू विक्राळ रूप धारण केले. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला होता. आगीत संपूर्ण घरच जळून खाक झाले होते. घरातील दृश्य पाहून पोलिसांसह ग्रामस्थही हादरले.

नवमी याची पत्नी संगीता (38) पाच मुलांसोबत उर्धा वॉर्ड क्रमांक-2 मधील बापूनगरमध्ये राहत होती. नवमीचे वडील सरयू खाटिक आणि आई शेजारच्या झोपडीत राहतात. नवमीच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांपूर्वी त्याचा संगीतासोबत काही गोष्टीवरून वाद झाला होता. ही गोष्ट संगीताने तिच्या माहेरच्यांना सांगितली होती. त्यांनी संगीताची चौकशी करून मुलांना घरी सोडण्यास सांगितले. नवमीने या गोष्टीला नकार दिला होता, यामुळे बुधवारी रात्री संगीताने रागाच्या भरात जेवण बनवले नाही. मुलांनी उरलेला भात मीठ आणि कांदा घालून खाल्ला. त्यानंतर ती मुलांना घेऊ घेऊन बाहेर जाऊन झोपली.

त्यानंतर रात्री संगीता 12 वाजता मुलांना घेऊन घरात झोपायला गेली. त्यानंतर अचानक घराला आग लागली. आगीमुळे घरातील सर्व जण आरडाओरडा करु लागले. आतून दरवाजा बंद असल्याने कुणालाच घरातून बाहेर पडता आले नाही. गावकऱ्यांनी आरडाओरडा ऐकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर गावकऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. बऱ्याच मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घरात जाऊन पाहिले असता सहा जणांचे मृतदेह पडले होते.