पत्नीने चिकन बनवलं नाही म्हणून भांडून खोलीत गेला आणि परतलाच नाही; समोर आलं धक्कादायक सत्य

Crime News : पत्नीने चिकन बनवण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि शेवटी भांडण संपल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या खोलीत गेले. मात्र त्यानंतर पती खोलीच्या बाहेर आलाच नाही. पोलिसांनी दरवाजा तोडून पतीला मृतावस्थेत बाहेर काढलं आहे. 

आकाश नेटके | Updated: May 26, 2023, 12:12 PM IST
पत्नीने चिकन बनवलं नाही म्हणून भांडून खोलीत गेला आणि परतलाच नाही; समोर आलं धक्कादायक सत्य title=

Crime News : पती पत्नीच्या नात्यात शुल्लक कारणांवरुन वाद होत असतात. मात्र हे वाद काही काळानंतर मिटून जातात. पण काही जण तो राग डोक्यात ठेवतात अन् असं काही करुन बसतात की कोणी त्याचा विचारही केला नसेल. असाचा काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या (UP Crime) झाशीमध्ये घडलाय. झाशीमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने आत्महत्या केली आहे. मोठ्या भावाने पोलिसांना (UP Police) बोलवल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

पत्नीने चिकन बनवायला नकार दिल्यामुळे पती इतका दुखावला की त्याने थेट आत्महत्याच केली. पतीने दरवाजाजवळील खुंटीला स्कार्फने गळफास लावून घेतला. मृत्यूची बातमी समजताच घरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

झाशीच्या प्रेमनगरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. पवनकुमार (36) इथे कुटुंबासोबत राहत होता. हंसारी येथे पवनकुमार फर्निचर बनवायचे. पवनकुमार मोठा भाऊ कमलेश शाक्य याने सांगितले की, पवनचे 4 वर्षांपूर्वी  लग्न झाले होते. बुधवारी रात्री पवन चिकन घेऊन घरी आला आणि त्याने पत्नीला स्वयंपाक करण्यास सांगितले. 2-3 वेळा सांगूनही त्याच्या पत्नीने चिकन शिजवले नाही. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण झाल्यावर प्रियांका दुसऱ्या खोलीत जाऊन पडली. पवननेही त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला.

"मी रात्री गच्चीवर झोपलो होतो. रात्री 1 वाजता खाली आल्यावर पवन खोलीचा दरवाजा उघडत नव्हता. मी माझ्या मुलीला बघायला पाठवले. तिने येऊन सांगितले काका काही हालचाल करत नाहीये. त्यामुळे याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता पवन फासावर लटकत होता," अशी माहिती कमलेशने दिली.

रात्री मद्यपान केल्यानंतर पवन चिकन घेऊन घरी आला होता. त्याने पत्नीला चिकन बनवायला सांगितले. पत्नीने नकार दिला कारण तिने आधीच जेवण तयार केले होते. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. मग वाद वाढत गेला आणि जुन्या गोष्टी समोर आल्या. दोघेही एकमेकांचा अपमान करु लागले. त्यानंतर हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. पवनने पत्नीला खूप मारहाण केली. त्यानंतर ती रडत एका खोलीत गेली आणि बेडवर पडली. पवनने दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.