धर्म आणि आया-बहिणींना वाचवायचे असेल तर मोदींनाच मत द्या; संतांचे आवाहन

संतांना मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. 

Updated: Nov 5, 2018, 07:48 AM IST
धर्म आणि आया-बहिणींना वाचवायचे असेल तर मोदींनाच मत द्या; संतांचे आवाहन title=

नवी दिल्ली: भारताची संस्कृती आणि आया-बहिणींचे रक्षण करायचे असेल तर जनतेने मोदी सरकारलाच पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय संत समितीकडून करण्यात आले. दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियमवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत समितीकडून राम मंदिर आणि अन्य धार्मिक मुद्द्यांवर ठोस भूमिका घेण्यात आली. 

जर आपल्याला जिवंत राहायचे असेल, मठ-मंदिरे वाचवायची असतील, आया-बहिणींचे रक्षण करायचे असेल, संस्कृती आणि संस्कार वाचवायचे असेल आणि त्याचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणे गरजेचे असल्याचे अखिल भारतीय संत समितीचे प्रमुख हंसदेवाचार्य यांनी सांगितले. 

संतांना मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. इतर कोणतेही सरकार आपल्याला न्याय देऊ शकणार नाही, असे त्यांना वाटते. राम मंदिराच्या उभारणीला उशीर झाल्यामुळे संत समुदायामध्ये काहीशी नाराजी आहे. परंतु, त्याचवेळी मोदी सरकारने राष्ट्र, धर्म, संस्कृती, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाभिमान जपण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर आम्ही समाधानी असल्याची प्रतिक्रिया हंसदेवाचार्य यांनी व्यक्त केली. 

मात्र, राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने अध्यादेश किंवा नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा मार्ग अवलंबवा, असा ठराव या परिषदेत संमत करण्यात आला.