'या' राज्यात दहावीची परीक्षा रद्द, सगळे विद्यार्थी पास

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

Updated: Jun 9, 2020, 05:38 PM IST
'या' राज्यात दहावीची परीक्षा रद्द, सगळे विद्यार्थी पास title=
संग्रहित फोटो

चेन्नई : तमिळनाडूमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. दहावीच्या परीक्षेबाबत तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दहावी बोर्डाची परीक्षा पूर्णपणे रद्द केली आहे. त्याशिवाय अकरावीच्या परीक्षादेखील घेतल्या जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तमिळनाडू सरकारने 15 जून रोजी घेण्यात येणारी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. या दहावीच्या परीक्षेसाठी जवळपास 9 लाख विद्यार्थी बसणार होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सहामाही परीक्षांच्याआधारे विद्यार्थ्यांना 80 टक्के गुण देण्यात येणार आहेत. तर उर्वरित 20 टक्के गुण देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लक्षात घेतली जाणार आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या काही पेपर्सच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. त्याशिवाय बारावी पास न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून त्याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचं, ते म्हणाले.

चेन्नई आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्याशिवाय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. याच पार्श्वभूमीवर 15 जून रोजी होणारी दहावीची परीक्षा रद्द केली असून विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश दिला असल्याचं ते म्हणाले. 

<