राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश, पाहा कोणत्या आणि किती ठिकाणी होणार निवडणुका

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश  

Updated: May 4, 2022, 03:44 PM IST
राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश, पाहा कोणत्या आणि किती ठिकाणी होणार निवडणुका title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यात राज्यातील 15 महापालिकांचा समावेश आहे. याशिवाय 210 नगर परिषदा, 10 नगर पालिका आणि 1930 ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.

इथे होणार महापालिका निवडणुका
मुंबई,  पुणे,  ठाणे,  उल्हासनगर,  पिपंरी चिंचवड,  सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

राज्य सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत अवधी मागितला होता. पण कोर्टाने अवधी देण्यास नकार दिला. तर पावसाळ्याचं कारण राज्य सरकारनं निवडणुका पुढे ढकलल्या. पण पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. इतर 8 राज्यात निवडणूक वेळापत्रकाचे अधिकार राज्याकडे असल्याचा मुद्दा राज्य सरकारनं पुढे केला.

परंतु आत्ता निवडणूकीचा मुद्दा आहे आणि महापालिकेचा कालावधी संपला आहे. प्रशासकाला 6 महिनेही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वेळेतच घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे.