खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक

सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही

& Updated: Aug 29, 2018, 12:05 PM IST
खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक title=

मुंबई : अनेकदा आपल्या वाचाळ बडबडीमुळे वादात अडकलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब पुन्हा एकदा चर्चेत आलेत... 'बदकांमुळे पाण्याचा ऑक्सीजन वाढतो' असं वक्तव्य बिप्लब देव यांनी केलंय. पण बिप्लब देब यांचं हे वक्तव्या नेहमीप्रमाणेच वादात अडकलं... सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. पण, खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो का? बदकांचं पाण्यातील अस्तित्व मत्स्यशेतीसाठी पोषक असतं का?

अधिक वाचा :- 'बदकांमुळे पाण्यातला ऑक्सिजन वाढतो', बिप्लब देव पुन्हा एकदा ट्रोल

काय सांगतात संशोधक

सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही. याचं कारण 'डक-फिश इन्टिग्रेटेड फार्मिंग'मध्ये सापडतं. एका संशोधनानुसार, ज्या तळ्यात बदकं असतील त्या तळ्यात माशांची पैदास बदकं नसलेल्या तळ्याच्या तुलनेत वेगाने होते. त्याचं कारण म्हणजे, उन्हाळ्यामध्ये तळ्यात वाढललेलं शेवाळ आणि हरित वनस्पती पाण्याचा पृष्ठभाग आणि पाण्याचा खोलवरचा भाग यात स्तर निर्माण करण्याचं काम करतात. (उन्हामुळे पाण्याचा पृष्ठभाग लवकर गरम होतो तर त्यामानाने खोल भागातील पाणी मात्र थंड असतं) हे वातावरण मासे उत्पादनासाठी अडथळा ठरू शकतं... अशावेळी बदकांचं पाण्यातील अस्तित्व आणि हालचाली पाण्याच्या खालच्या स्तरापर्यंत ऑक्सीजन स्थिर ठेवण्याचं काम करतं... ऑक्सीजन पृष्ठभाग आणि खालच्या स्तरापर्यंत कायम राहिल्यानं असं वातावरण मत्स्यशेतीसाठी पूरक ठरतं.  

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन

बिप्लब देब यांचे ओएसडी संजय मिश्रा यांनीही त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिलाय. 'मुख्यमंत्र्यांचं बदक पाण्यात पोहल्यानं ऑक्सीजनची पातळी वाढण्याचं वक्तव्य योग्यच आहे... छत्तीसगडच्या इंदिरा गांधी कृषि विद्यापीठाच्या एका शोधानुसार, जेव्हा बदक पाण्यात तरंगतात तेव्हा वायुमंडळात फॉस्फेट आणि इतर खनिजं निर्माण होतात जे हरीत शेवाळाच्या वाढीला मदत करतात... हे हरीत शेवाळ पाण्यातील ऑक्सीजनचा मुख्य स्त्रोत आहेत...' असं सांगत सारवासारवीचा प्रयत्न केलाय.

काय म्हटलं होतं बिप्लब देव यांनी...

आपल्या राज्यातील ग्रामीण भागांत ५०,००० बदकं वितरीत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, असं देव यांचं म्हणणं आहे. बदकांचे फायदे सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी 'बदकांमुळे ऑक्सिजनचं रिसायकलिंग होतं...आणि त्यांचं पाण्यात पोहणं पाण्याची ऑक्सिजनमध्ये भर टाकतं आणि पाण्यातला ऑक्सिजन वाढतो' असं त्यांनी म्हटलंय.